अनुक्रमणिका
अवतरण | 311 | |
संपादकीय | 313 | |
पाहता गगनही दिसे टांचे | ले. सौ. वीणा मोहन फाटे | 316 |
शतपैलु व्यक्तिमत्त्व | भागवताचार्य श्री. वा. ना. उत्पात | 324 |
तीर्थरुपांची तीर्थयात्रा | श्री. प्रशांत प्र. अभ्यंकर | 331 |
स्वामी वरदानंदभारती… | डॉ. कल्याणी माधव नामजोशी | 343 |
परमामृत – शून्य खंडण | श्री. बाळासाहेब हळदे | 352 |
योगवासिष्ठ… | आचार्य श्रीमती विमल पवनीकर | 359 |
संस्कृत आणि मराठी… | डॉ. सौ. वीणा गानु | 364 |
श्रीज्ञानेश्वरीतील… | श्री. समीहन च. आठवले | 372 |
गीता रहस्यातील… | डॉ. सौ. राजलक्ष्मी बर्वे | 379 |
हे हिंदू नृसिंहा… | डॉ. सुमंत दत्ता टेकाडे | 385 |
आचार रसायन… | वैद्य सर्वेश अजित कुलकर्णी | 391 |
रामजन्मभूमी आणि… | श्री. सर्वेश फडणवीस | 394 |
जगत् जीव ईश्वर… | सौ. ममता गद्रे | 397 |
पाश्चात्त्य शास्त्र व पौर्वात्य शास्त्र | श्री. मकरंद अभ्यंकर | 401 |
गुरुचरित्र – एक चिंतन | वे. मू. श्रीकांत चितळे गुरुजी | 410 |
शारदीय आल्हाद… | डॉ. विभा जयंत महाजनी | 418 |
संपादकीय
प्रज्ञालोक ह्या त्रैमासिकाचा या वर्षातील हा शेवटचा अंक! जुन्या-नव्या लेखकांचा सुरेख संगम येथे अनुभवास येईल. राष्ट्रीय व सांस्कृतिकदृष्ट्या संवर्धन व्हावे, नवीन पिढीला भारतीय मूल्ये, धारणा व सिद्धांत यांची मौलिकता समजाविण्याकरिता वेगवेगळी सदरे देऊन ते तरुणाईच्या गळ्यात उतरविण्याचा याद्वारे सातत्याने प्रयत्न करीत आहोत.
दत्तजयंतीपासून तर माघ वद्य द्वितीयेपर्यंतचा हा काळ (शैल यात्रा गमन) दत्तभक्तांसाठी फार पवित्र आहे. श्री क्षेत्र कारंजा येथे हा पूर्ण काळ उत्सवाचा असतो. ह्याच काळात पौष पौर्णिमेला श्री क्षेत्र आळंदी येथे श्री नरसिंव्हसरस्वती स्वामींनी आपले 12 वर्षाचे कार्य प्रगट करून समाधी घेण्याची लीला केली. तेथून ते गुप्त होऊन पुढे लोकोद्धाराच्या कार्यासाठी निघाले. श्री महाराज निरनिराळ्या ठिकाणी गुप्त होण्याची लीला करीत व ‘आम्ही तेथेच वास करतो’ असे भक्तांना सांगतात व त्याचा प्रत्ययही देतात. अशा ह्या दत्तमहाराजांचा आम्हा सर्वांवर कृपा आशीर्वाद असो.
गेल्या तीन महिन्यात बर्याच मोठ्या घटना भारताच्या इतिहासात घडल्या. त्यातील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे राममंदिर उभारण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय. खरे तर हा देश हिदुंचाच. येथे असलेल्या निरनिराळ्या स्थावर, जंगमावर आक्रमण होऊन सर्व देश पारतंत्र्यात लोटला गेला. येथील लोक गुलाम झाले. स्त्रिया व मुलांना अतिशय वाईट वागणूक मिळत गेली. येथील सारी समृद्धी परकियांच्या हातात गेली. तसेच रामजन्मभूमीही परकियांच्या ताब्यात गेली. आक्रमकांच्या ठरलेल्या पद्धतीने हिंदुंची सारी श्रद्धास्थाने उद्ध्वस्त करून मशीद बनवणे हा उद्योग अयोध्येतही झाला. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर जसे सोमनाथचे भाग्य फळफळले तसेच रामजन्मभूमीचे व्हावयास हवे होते पण – आपलेच लोक त्यात अल्पसंख्यकांच्या लांगूल चलनामुळे त्या पवित्र कार्याला विरोध करू लागले. हिंदूच्या बाजूने ढळढळीत पुरावे असतांना त्यांच्यावर नको त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रसंग आला. आपल्याच देशात, आपणच आपले अधिकार घालवून बसलो. हा सर्व राजकारणाचा त्रास हिंदू स्वातंत्र्यातही भोगत होते. रामलल्लावर श्रद्धा ठेवून आंदोलने झालीत. त्यात कित्येक हिंदुंचा बळी गेला. त्यातील कोठारी बंधूंचा मृत्यू मनाला चटका लावणारा आहे.
असो. आज ह्या सार्या संघर्षाचा परिपाक म्हणून आम्हास राममंदिर बांधण्याचा अधिकार मिळाला आहे. आता यात कोठेही राजकारण न आणता सर्व मिळून तेथे भव्य दिव्य रामंमंदिर निर्माण करू. जय श्रीराम !
नुकत्याच महाराष्ट्रात निवडणुका पार पडल्या व बहुमत असूनसुद्धा देवेन्द्र फडणविसांना पराभव पत्करावा लागला. शिवसेनेचे पुत्रप्रेम व त्यासाठी हिंदुत्वाला दिलेली तिलांजली पचवायला महाराष्ट्रातील ज्या लोकांनी युतीला मत दिले, त्यांना फार कठीण गेले. त्यातच वीर सावरकरांबद्दल निंदास्पद बरळणार्या काँग्रेसचा हात धरून सिंहासनावर चढणार्या उद्धवसाहेबांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे! ब्राह्मण मुख्यमंत्री झालेला ब्राह्मणद्वेष्ट्या जाणत्या राजाला पसंत नव्हते. जाणता राजाचा खेळ यशस्वी झाला. त्यांनी आपल्या ह्या भावना उघडपणे लोकांना दाखविल्या. भाजपने शिवसेनेशी युतीच केली नसती तर कदाचित ते स्वबळावर मताधिक्याजवळ पोहचले असते व इतरांच्या सहकार्याने राज्य मिळवले असते. असो महाराष्ट्रातल्या लोकांचे दुर्दैव की इतका चांगला ‘राजा’ त्यांना गमवावा लागला.
श्री. देवेन्द्र ह्यांची काम करण्याची शैली व गुणवत्ता वाखाणण्यासारखी आहे. तरीही ज्या तर्हेने शिवसेनेने स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपाला दगा दिला तो निंदनीय आहे. मराठा लॉबीला आरक्षणासाठी मदत केली असतांना सुद्धा त्यांनी देवेन्द्राकडे पाठ केली व “पावसात भिजलेल्या जाणता राजाला” मदत केली. तसेच महाराष्ट्रातील सवर्णांना न्याय देण्यात देवेन्द्र कमी पडले, त्यामुळे तो वर्ग फार दुखविला गेला आहे.
राष्ट्रवादीच्या सरकारमधील सहभागामुळे जातीयवादी शक्ती परत डोके काढतील. त्यात 5% मुस्लीम आरक्षणाबद्दल बोलून त्यांनी त्यांचे मनसुबे जाहीर केले आहेतच. आपले दुर्दैव की आता महाराष्ट्राचे वाईट दिवस आले आहेत. सर्व स्वार्थीपक्ष त्यांच्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातील जनतेला पिळून काढतील. परमेश्वरच जनतेचे रक्षण करो.
श्रेष्ठ अशी गुरुपरंपरा लाभलेले, अतिशय विद्वान्, निःस्पृह, परखड विचार मांडणारे, कुशल वैद्य, तपःपूत आध्यात्मिक जीवन जगणारे, तत्त्वनिष्ठ व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रसिद्धिपराङ्मुख असे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रज्ञालोकचे संस्थापक संपादक डॉ. ब. स. येरकुंटवार होत. 2020-2021 हे वर्ष त्यांच्या 25 व्या पुण्यस्मरणाचे आहे. त्या निमित्ताने त्यांची जीवनशैली, कार्य, व्यक्तिमत्त्व आणि वाङ्मय यांचे विविध पैलू उलगडणारे लेखन व्हावे असा प्रज्ञालोक परिवाराचा मानस आहे. प.पू. वरदानंद भारती यांच्या वरील लेखनाला जसा प्रचंड प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद डॉ. ब. स. येरकुंटवार (पू. बळीकाका) यांचे करिता मिळेल ही खात्री आहेच. घरगुती संबंध असणार्या सौ. वीणाताई फाटे यांनी शुभारंभ केला आहे.
परस्परातील स्नेहपूर्ण संबंध जोपासणारा, वाढविणारा, मकर संक्रांतीच्या सणाच्या सर्वांना शुभेच्छा! या संक्रमण काळात प्रज्ञालोक यशस्वीपणे वाटचाल करीत आहे, हे त्या जगन्नियंत्याच्या स्नेहार्द्र कृपेमुळेच!